ऍड.रेणुकाताई चलवादी यांनी मानले मतदारांचे आभार!
अवघ्या पंधरा दिवसांच्या बाळासह प्रचारात उतरून वेधले होते सर्वांचे लक्ष
प्रभाग सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प
येरवडा : प्रतिनिधी
अवघ्या पंधरा दिवसांच्या बाळासह प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर-नागपूर चाळ) निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेल्या रणरागिनी ऍड.रेणुकाताई चलवादी यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.पंरतु, काही मतांच्या फरकांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.निवडणुकीचा कौल मान्य करीत त्यांनी तमाम मतदारांचे आभार मानले आहे. हा पराभव जिद्द कमी करणारा नसून, समाजसेवा आणि नागरिकांच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याची नव प्रेरणा देणारा आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात , संघटन शक्तीच्या बळावर लहान बाळासह प्रभागाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू,असा विश्वास ऍड.रेणुकाताईंनी यानिमित्ताने सर्वसामान्यांना दिला आहे.
आपण दिलेला प्रत्येक मताचा सन्मान माझ्यासाठी अमूल्य आहे. निवडणुकीत विजय-पराभव येत असतो; मात्र जनतेशी असलेली नाळ आणि सेवाभाव कायम असतो. मी निवडणूक हरले असेन; पण समाजसेवा, नागरिकांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण, युवकांचे प्रश्न आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीची लढाई मी कधीच थांबवणार नाही. आजपर्यंत ज्या विश्वासाने आपण मला साथ दिली, तोच विश्वास माझ्या कामातून टिकवून ठेवण्याचा मी निर्धार करते, अशा भावनिक शब्दांमध्ये त्यांनी मतदारांचे आभार मानले आहे.
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सोबत घेवून प्रचार करणे ऍड.रेणुकाताईंसाठी बरचे आव्हानात्मक होते. पंरतु, जनसेवेचे व्रत घेतलेल्या रेणुकाताईंनी हे आव्हान देखील लिलया पेलले. प्रभागातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्न त्यांनी केला.जनसेवा केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसते. कायम प्रभागातील नागरिकांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी उभी राहीन,असा विश्वास त्यांनी दिला. प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी, सर्व मतदार, कार्यकर्ते, समर्थक आणि कुटुंबीयांचे आभार मानत ऍड.रेणुकाताई चलवादी यांनी सांगितले की, हा पराभव नव्या उमेदीने काम करण्याची सुरुवात आहे. “आपल्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच पुढील वाटचाल अधिक मजबूत होईल,” असा भावनिक संदेश त्यांनी मतदारांना दिला.















